*जल, जंगल, जमीन आणि आदिवासी*
विचार करा एखादा परका व्यक्ती तुमच्या घरात पाहुणा म्हणून येतो, तुम्ही त्याचा पाहुणचार करता, काही कालावधी नंतर तो व्यावसायिक दृष्टीने घरात बदल करायला लागतो, घराचं मूळ स्वरूपच विद्रुप करतो, त्यामुळे तुमच्या जगण्याचे प्रश्न उभे राहतात, तदनंतरही तुम्ही शांत बसाल का? बंड करालंच ना?
अगदी आतापर्यंत निर्माण झालेल्या भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ सगळ्या भाषेतील चित्रपट पाहिल्यास आपण पाहिले आहे की आपल्या पूर्वजांच्या जल, जमीन, संपत्तीचे रक्षण करणारा आपल्यासाठी हिरो असतो आणि पुढे हेच चित्रपट सर्वात जास्त पैसा कमावणारे ठरतात.
हे जर सर्वमान्य सत्य असेल तर हजारो वर्षांपासून जंगलात राहणारा पिढ्यानं पिढ्या ज्यांनी जल, जंगल, जमीन यास देवता मानून पूजली व जोपासली, त्या वसुंधरेला वाचविण्यासाठी हा आदिवासी बंड करतो तर तो व्हिलेन कसा ठरू शकतो?
मला माहिताय मी हे लिहताना मोठी रिस्क घेतोय, कारण ज्यांनी ज्यांनी त्या बाजूने लिहण्याचा बोलण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना या भांडवलदारांच्या हातातील सरकारने शहरी नक्षली म्हणून तुरुंगात डांबलंय. तरीही मी लिहणार, कारण यावर बोलणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
आता पर्यंत जरी माझ्या भेटीस कोणी असा नक्षलवादी आला नाही तरी लिखाणासाठी भारतातील काही राज्यातील जंगलात फिरत असताना, स्थानिक आदिवासीसोबत चर्चा करताना हे नक्षलवादी कोण्या रॉबिनहूड पेक्षा कमी नाहीत हेच जाणविले. सगळ्यांच्या मनात यांच्याबद्दल एक आदराची भावना या लोकांमध्ये दिसून आली.
त्यांना नक्षलवादी म्हणून घडण्यासाठी तसें अनेक जुने मुद्दे आहेत, पण सध्या दोन मुद्दे मला इथे मांडायला हवेत असे मला वाटतेय कारण हा विकलेला मीडिया हे दाखवणार नाही.
1. मध्य प्रदेशातील कुनो नेशनल पार्कमध्ये मोदीजी नी 8 चिते आणून वसवले, त्यानंतर आपल्याला एवढंच दिसलं किंबहुना एवढंच दाखवलं गेलं. पण त्यासाठी या जंगलातील 22 गावातील हजारो कुटुंबाना विस्थापित व्हावं लागलं, याबद्दल कुठेच बातमी नाही. या आदिवासीना आपलं पिढ्यानं पिढ्याचं जल, जंगल, जमीन सोडून जावं लागलं.
हीच गत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 25 खाणीसाठी खोदकाम आणि जंगल तोड सुरू केले केलेली आहे, त्यासाठी सुध्दा स्थानिक आदिवासी कुटुंबाना सैन्य बळाचा वापर करीत विस्थापित करण्याचे कार्य सुरू झालंय.
हेच गेली अनेक वर्ष सुरू आहे, काँगेस असो की भाजपा यांनी आलिपाळीने सुरू ठेवलंय.
यावर माझे अनेक मित्र म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हाती शस्त्र घेणं चुकीचं आहे. शस्त्र न घेता लढा म्हणावं, हाच प्रश्न मी तेथील स्थानिकांना विचारला यावर तेथील स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पाकिस्थान व चिन हे बाहेरचे आहेत त्यांच्या विरुद्ध लढताना शस्त्र वापरता हे ठीक आहे पण मग घरच्या लढाईत पोलीस बळ व सैन्य बळ तसेच शस्त्रात्रे वापरले जातात का?
हा लढा आमच्या जल जंगल जमीन हीं साधन संपत्ती वाचविण्यासाठी आहे, आम्ही निसर्गाला पूजतो, आमचे देव आहेत हे, आमच्या हातून हेच गेले तर आम्हाला सुध्दा तुमच्या शहरात पोटासाठी भीक मागावी लागेल. यासाठी आम्ही लढतोय तर यावर आमच्यावर गोळ्या झाडणारे आम्हाला शस्त्र का घेता असे म्हणतात.
आमची 750 कुळं जगभर आहेत, आम्ही इथले मूळनिवासी आहोत.
आमचा मूळ लिंगो जंगो आम्ही त्यास पूजतो, त्याचा फोटो मी सोबत देत आहे (योनी, अर्ध शिष्न, आणि बाहेर पडणारे शुक्राणू असावेत.) हे प्रकृती निर्मितीचे साधन तोच आमचा देव आहे."
मी नीट पाहिले तर ते थोडे बहुत त्रिशूल सारखे दिसते, त्यावरूनच त्रिशूलाची निर्मिती झाली असावी, असे वाटावे, कारण हे आदिवासी महादेवाला बुढाबाबा तर पार्वती ला महामाया म्हणतात.
आता शेवटी प्रश्न राहतो हे नक्षलवादी, दहशतवादी आणि क्रूर आहेत का?
हाच प्रश्न त्यांच्या घरात राहून स्वतःची प्रगती करत पुरस्कार घेतलेल्या प्रकाश आमटे यांना विचारा!
त्यांना कधी तरी विचारा, की हे आदिवासी का करतायेत हे ? तुम्हाला काही त्रास दितायेत का?
- प्रमोद शिंदे
9967013336